Skip to main content

आनंद सहल

आनंद सहल 
आज रविवार ..सुटीचा दिवस असल्यामुळे कुठे तरी बाहेर फिरून येण्याचा बेत ठरला,तसा ४-५ दिवसांपासून पाऊस देखील पडेनासा झाला असल्याने नागार्जुन देवस्थान, अंबाळा, रामटेक गडमंदीर आणि नगरधन किल्ला बघून यावे असे ठरले. सकाळी ७.३० वाजता आम्ही घरून निघालो. ९.३० ला मनसर  ला पोहचलो,तिथे गरमागरम चहा घेऊन नागार्जुन मार्गे पुढचा प्रवास सुरु झाला. अर्ध्या तासात नागार्जुन देवस्थान ला पोहचलो. देवस्थान बरेच उंचावर असल्याकारणाने तिथे दगडी पायऱ्या आहेत. पायऱ्या जवळपास ३५० असून सर्व उभ्या धाटणीच्या आहेत, त्यामुळे चढतांना बरीच दमछाक होते. चढतांना दोहो बाजूला मस्त हिरवीगार झाडे आहेत. जसं जसं आपणं वर चढत जातो तसा वारा देखील वाहत असतो, त्यामुळे आलेला थकवा आणि घाम क्षणात विरून जातो,परत नव्याने चढण्यासाठी स्फूर्ती येते. अर्ध्या पायऱ्या चढल्यावर दुरून मंदिराचे दर्शन होते. तेव्हा पाऊले आपसूकच उत्साहाने पुढे पडत असतात. चढतांना आपण किती पायऱ्या चढलो यांचे भान राहत नाही परंतु उतरतांना आठवणीने पायऱ्या मोजल्या. निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत घेत देवस्थानच्या परिसरात पोहचलो. आजूबाजूचा परिसर हिरव्यागार झाडांनी व्यापलेला आहे. देवस्थानात पिण्याच्या पाण्याची सोय आहे बघून आश्चर्य वाटले. आम्ही जेव्हा देवस्थानात पोहचलो तेव्हा मंदिराच्या दाराला कुलूप होते. आम्ही बाहेर उभे राहून दर्शन घेतले. तेवढ्यात पुजारी आले आणि आम्हाला आत बोलावून दर्शन घ्यायला लावले. ऑगस्ट महीन्याच्या २५ तारखेला मंदिरात गोपाल काला आणि महाप्रसाद आहे तेव्हा आपण सर्वांनी यावे असे सांगून त्या कार्यक्रमाची पत्रिका देखील दिली. परिसरात मारोती ची देखील मूर्ती आहे. सर्व देवांना मनोभावे नमस्कार करून हळूहळू चढण उतरायला सुरुवात केली. 
निसर्गाच्या सान्निध्यात कधी खाली उतरलो कळलेच नाही. नंतर रामटेक ला श्री रामाचे दर्शन घ्यायला गडमंदिराकडे आमचा प्रवास सुरू झाला. आज ऊन फार होते त्यामुळे गडमंदिराच्या पायऱ्या चढतांना घामाच्या धारा वाहू लागल्या होत्या. गडमंदिरावर पायऱ्या पायऱ्या वर खूप माकडे असतात त्यांच्या करीता आठवणीने फुटाणे विकत घेतले. आधी श्री लक्ष्मणाचे दर्शन घेवून नंतर श्री रामाचे दर्शन घेतले. थोडा वेळ रामझरोक्याला बसून गडमंदिराच्या पायऱ्या उतरून जवळ असलेल्या एका छोट्या रेस्टॉरंट मध्ये घरून आणलेल्या डब्यावर ताव मारला. गर्मीचा त्रास होत होता पण भुकेपोटी तो जाणवला नाही. जेवण झाल्यावर थोडा वेळ अंबाळ्याला जावून आलो आणि नंतर २०० वर्ष जुन्या नगरधन च्या किल्ल्याला भेट दिली.




Comments

Popular posts from this blog

इतिहास :पोळा मारबत, नागपूर

 नागपुरातील मारबतीचा इतिहास  स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांना चिडविण्यासाठी मारबत काढण्याची प्रथा सुरू झाली. प्रामुख्याने मस्कासाथ, इतवारी तसेच जागनाथ बुधवारी या  ठिकाणाहून काळी आणि पिवळी अशा दोन मारबती निघतात. या दोन्ही मारबती नेहरू पुतळा चौकात एकत्र येतात. मारबतींमधील बडग्या हा विशेष चर्चेचा विषय असतो. ज्या गोष्टींचा निषेध करायचा आहे,त्याचा बडग्या या मारबतींसोबत असतो. निषेध करण्यासाठी  'घेऊन जा गे मारबत' हा नारा दिला जातो. पुढे मारबतींसोबतच सर्व बडग्यांचे  नाईक तलाव येथे दहन केले जाते. 'मारबत व बडग्या' हा जगातला एकमेव असा मिरवणुक प्रकार फक्त नागपूरातच आहे. पुर्वी, बांकाबाई हिने ईंग्रजांशी हातमिळवणी केली त्याचा निषेध म्हणुन बांकाबाईच्या, कागद व बांबू वापरुन केलेल्या पुतळयाची, तान्ह्या पोळ्याच्या दिवशी (पोळ्याचा दुसरा दिवस)मिरवणुक काढण्यात येते व मग त्याचे दहन होते.या मध्ये काळी व पिवळी मारबत असे दोन प्रकार आहेत.बाकांबाईच्या नवर्‍यानेपण या तिच्या कृत्याचा विरोध केला नाही म्हणुन त्याचाही पुतळा बनवून सोबतच त्याचीपण मिरवणुक काढतात. तिच्या नवऱ्याच्या पुतळ्

हर फिक्र को धुंए में उड़ाता चला गया

जवळपास रात्रीचे ८ वाजले असतील, मी आणि अक्षय कांही खरेदी करण्यासाठी सिताबर्डी वर गेलो होतो. रिजंट टॉकीजचे जवळ एक पानठेला आ हे. मी कधी पानठेल्यावर जाऊन पान किंवा तत्सम मुखशुद्धी करणारे पदार्थ खायला फारसा जात नाही. पण या वयाचे ७७ वर्ष पूर्ण झालेल्या पानठेले वाल्याकडे माझे लक्ष नकळत गेले. मी उत्सुकतेने त्या ठेल्याकडे गेलो. त्याचा हसतमुख चेहरा बघून खूप छान वाटले. थोडावेळ गप्पाटप्पा झाल्या. बोलण्याच्या ओघात त्यांनी सांगितले की जवळपास ५० वर्षांपासून याच पानठेल्यावर ते काम करत आहेत. पानठेला त्यांचा स्वत:चा आहे. मध्येच त्यांनी एका गाण्याची तान छेडली " मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुंए में उड़ाता चला गया" . मी विचार करु लागलो की त्यांच्या गाण्यात किती सत्यता होती. आणि म्हणूनच ते अविरत ५० वर्षांपासून आनंदाने आपले काम करत आहेत. आजच्या धकाधकीच्या जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाने मनमोकळेपणाने संवाद साधला पाहिजे, आनंदी रहायला पाहिजे. या थोड्या वेळाच्या भेटीमध्ये तो पानठेलेवाला मला जिवन जगण्याचं तत्वज्ञान शिकवून गेला.