बरेच दिवसांपासून बस्तर, छत्तीसगढ़ येथे जाण्याचे मनात होते, त्यामागील कारणही तसेच होते. मी नुकताच इयत्ता ४ ची उत्तिर्ण झालो होतो. माझ्या आजोबा जगदलपूर येथे नोकरीला होते. जगदलपूर त्यावेळी मध्यप्रदेशात येत होते, आता ते छत्तीसगड मध्ये येते. आजोबा मला जगदलपूर ला सोबत घेऊन गेले. तिथेच त्यांनी माझा दाखला ५ व्या इयत्तेत केला. त्यामुळे ५ वी चे शालेय शिक्षण जगदलपूर येथे झाले. नंतर मी माझ्या गावी लोधीखेड्याला परत आलो. त्यावेळ पासून मला जगदलपूर आणि आजुबाजूच्या परिसर मला खूपच आवडला होता. बरे असो !
मागच्या महिन्यात एक ट्रॅव्हल कंपनीची बस्तर टूर करिता जाहिरात बघितली आणि त्यांचे सोबत जाण्याचे नक्की केले. बस्तर पावसाळ्यात बघण्याची मजा काही औरच असते. पावसाळी दिवस असल्याने सर्वांनी सोबत रेनकोट,छत्री आणि कॅप जवळ बाळगण्यास सांगितले होते. सगळी तयारी करता करता जाण्याचा दिवस येऊन ठेपला. वंदेभारत ट्रेन जायचे असल्यामुळे सोबत डबा वैगेरे घेऊन जाण्याची गरज नव्हती कारण ट्रेन मध्ये जेवण आणि चहा मिळतो. ११ जुलैला दुपारी २ वाजता वंदेभारत एक्सप्रेस ने जायचे होते. आम्ही सर्व प्लॅटफॉर्म क्रमांक ८ वर गोळा झालो. अगदी वेळेवर ट्रेन नागपूर स्थानकावरून सुटली. थाड्या वेळात जेवण आले, जेवण झाल्यावर आइस्क्रीम मिळाले. संध्याकाळी चहा मिळाला. ५.४५ ला रायपुर आले . त्यादिवशी आमचा मुक्काम रायपूरला एक हॉटेल मध्ये होता. आमच्यातील काही मंडळी नाशिक आणि मुंबईहून येणार होते. ते डायरेक्ट रायपूरला आमच्या आधीच पोहचले होते. हॉटेल मध्ये फ्रेश झाल्यावर रात्रीच्या जेवणाचे वेळी आम्ही सर्व पहिल्यांदा भेटलो. एकमेकांशी ओळख करून सर्वांनी जेवण उरकले. आम्ही २५ प्रवासी होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता बस ने जगदलपूर करिता रवाना व्हायचे होते म्हणून जेवण झाल्यावर झोपायला आपआपल्या रूम मध्ये गेलो. सकाळी ब्रेकफास्ट आणि चहा घेऊन बस मधे बसलो. गणपति बाप्पा मोरया, गजानन महाराज की जय म्हणून प्रवासाला सुरूवात झाली. बस मधे आमच्या सोबत आचारी होते. सोबत टूर मॅनेजर वेळोवेळी सूचना देत होते. संध्याकाळी ६.३० वाजता आम्ही जगदलपूरला पोहोचलो. तिथे आम्हाला एका रिसॉर्ट मध्ये राहण्याची सोय केली होतो.हे रिसॉर्ट जगदलपुरहून ६ कि.मी. दूर होते. रात्री चे जेवण आटोपून सगळी मंडळी झोपायला गेली. सकाळी ८.३० ला आम्हाला चित्रकूट धबधबा बघण्याकरिता बस निघाली. चित्रकूट ४० किलोमीटरवर आहे. चित्रकूट धबधबा रुंदी जवळपास ३०० मीटर आहे. आणि चित्रकूट धबधब्याला भारताचे नायगरा म्हणतात असे ऐकले होते . प्रत्यक्ष बघताना याची साक्ष पटली . धाडधाड आवाज करत धबधबा निरंतर १०० फूटावरून खाली कोसळत असतो. त्याचे तुषार पाहणाऱ्यांना ओले करतात.
आजूबाजूचा हिरवागार प्रदेश बघून तिथून जावूच नये असे वाटत होते पण वेळेचे बंधन असल्याकारणाने आम्हाला निघावे लागले . त्याच दिवशी चित्रकूट पासून ३५ किलोमीटर अंतरावर 'तुमडाघुमर' नावाचा धबधबा आहे .हा धबधबा बघताना मन भारावून जाते. धबधब्याचा आनंद घेऊन संध्याकाळी जगदलपुर ला रिसॉर्ट वर पोहोचलो. दुसऱ्या दिवशी सकाळी निघालो 'चंपारन ' बघायला. राजिम नावाच्या गावी चंपारन आहे . चंपारण किंवा चंपारण्य, ज्याला पूर्वी चंपाझार म्हणून ओळखले जात असे, येथून नामशेष झालेल्या चंपा फुलांच्या जंगलांवरून हे नाव देण्यात आले आहे, हे भारतातील छत्तीसगड राज्यातील रायपूर जिल्ह्यातील एक गाव आहे. हे प्रसिद्ध आहे कारण ते वल्लभ पंथाचे सुधारक आणि संस्थापक वल्लभाचार्य यांचे जन्मस्थान आहे. येथे वल्लभाचार्यांची समाधी आहे. भोवताली रामजानकी मंदिर, यमुना मंदिर, बालकृष्ण लाल मंदिर, राजीव लोचन मंदिर आणि साक्षी गोपाल मंदिर अशी उत्कृष्ट नक्षिकाम केलेली बरीच मंदिरे आहेत . तिथूनच थोड्या अंतरावर मामा- भांजा मंदिर आहे . श्री पंचेश्वर नाथ मामा आणि श्री कुलेश्वर नाथ भांजा. राजीम हे विष्णूला समर्पित राजीमचे मुख्य हिंदू तीर्थस्थान असलेल्या राजीव लोचन मंदिराच्या नावावरून ठेवले गेले आहे.
येथे शिवाला समर्पित प्राचीन कुलेश्वर महादेव मंदिर देखील आहे. या शहरात महानदी, पैरी, आणि सोंडोर या नदींचा त्रिवेणी संगम होतो. इतके महत्त्वाचे असल्याने, राजीमला छत्तीसगडचे प्रयाग देखील म्हटले जाते. ही सगळी मंदिरे पाहून झाल्यावर रात्री ८ वाजता रिसॉर्ट वर परत आलो. आजचा दिवस देवदर्शनाचा होता. सकाळी आज आम्ही बस्तर मधील प्रसिद्ध असलेले दंतेश्वरी मंदिर बघायला गेलो. दंतेवाड़ा जिल्ह्यात हे मंदिर आहे . या देवीची इथे खूप मान्यता आहे. मंदिर चा परिसर भव्य आहे . इथे हनुमानाची ५० फुटाची मुर्ती आहे. मंदिर बघून झाल्यावर तिथूनच काही अंतरावर असलेल्या तिरथगड धबधबा बघायला गेलो. हा धबधबा बघण्या करिता जवळपास १५० पायऱ्या खाली उतरून जावे लागले. खाली उतरल्यानंतर समोर प्रचण्ड धो धो कोसळलेला धबधबा दिसतो. निसर्गाचे अप्रतिम आणि अवर्णनीय सौंदर्य बघताना डोळे भरून येतात. निसर्ग किती भरभरून आपल्याला देत असतो आणि आम्ही या निसर्गाची मुळीच काळजी घेत नाही. या धबधबा खाली उभे राहून आंघोळ करता येते. त्यामुळे बरीच मंडळी अंघोळीचा मनसोक्त आस्वाद घेतात. आता संध्याकाळ व्हायला आली होती म्हणून आम्हाला जगदलपुर ला परत यावे लागले . दुसऱ्या दिवशीं प्रतीक्षा प्रवास सूरू झाला. आमची शिवनाथ express रात्री १०.४० ला होती. ती वेळेवरच आली सकाळी ५.३० इतवारी स्टेशन ला पोहचलो.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा